शनिवार, 1 अक्टूबर 2022

IAS असीमा मित्तल मॅडम

 कामाच्या परिसीमा ओलांडणारी असिमा....


रात्री उशीराने मोबाईलची लाईट चमकली म्हणून मोबाईल हातात घेतला व व्हॉट्स अपवर आलेला मेसेज वाचू लागलो. अनेक मेसेज होते, परंतु त्यातील एकात असिमा मित्तल मॅडम यांची बदली झाल्याचा मेसेज वाचून मन अगदी रितं झालं. काल त्यांचा पिवळ्या रंगाच्या साडीतला फोटो डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यांचं ते वागणं... शिक्षकांकडून काम करून घेण्याची पद्धत....इथल्या पाड्यांवर काम करण्याची तळमळ...आदिवासी बांधवांच्या शेतीविषयक समस्या समजून घेण्याची उदारता...वेळेच्या बाबतीत असणारा काटेकोरपणा आणि तितकीच विनम्रता असे अनेक गुण मनाला छेडू लागले आणि मग एकंदरीत त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहिला.


राजस्थानमधील जयपूर या पिंक सिटीत त्यांचा जन्म 30 जून 1992 रोजी झाला. जयपूरच्या मातीतले संस्कार काल त्यांच्या पिवळ्या रंगाच्या साडीवरून दिसून आले असतीलच. नवरात्रीच्या नऊ रंगांची जादू एकंदरीत त्यांच्याही मनावर असल्याचे त्यातून दिसून आले. 


शालेय जीवनापासूनच असिमा अभ्यासात हुशार होती. परंतु ती फक्त पुस्तकी किडा देखील नव्हती. विविध स्पर्धा असोत वा शालेय खेळ यात भाग घेऊन ती त्यात नेहमी अव्वल येत असे. तिने शालेय जीवनातच अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत भाग घेऊन यश मिळवले होते. त्यामुळे आपण कोणतीही परीक्षा दिली तरी त्यात हमखास यश मिळेल असा आत्मविश्वास तिच्या मनात तयार झाला होता.


आपले कष्ट व चिकाटी यांवरील आत्मविश्वासामुळे तिने जेईईचा फॉर्म भरताना फक्त आय आय टी, मुंबई हा एकमेव पर्याय दिला. तिच्या जागेवर दुसरा कोणी असता, तर त्याने नक्कीच 10-20 पर्याय अजून निवडले असते हे मात्र नक्की. परंतु इतिहास घडवणारी माणसं मुळात हटके असतात आणि ते कोणत्याही चौकटीत बसत नाहीत हेच असिमाच्या बाबतीत आपणास दिसून येते.


आय आय टी मुंबईत पदवीचं शिक्षण घेऊन तिने सिव्हील इंजिनिअर ही पदवी तर प्राप्त केलीच सोबत गोल्ड मेडल देखील मिळवले होते.


पदवीचं शिक्षण चांगल्या श्रेणीत पूर्ण केल्याने तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळायला फार उशीर लागला नाही. उत्तम सोयी सुविधा असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी ती आता करू लागली होती. परंतु मन मात्र त्या ऐशोआरामात रमत नव्हतं. असिमा या अशा टिपिकल कामासाठी बनलेली नाही हे तिचं मन तिला सारखं सांगत होतं.


आपलं मन काय सांगतंय हे तिनं ऐकलं व इतक्या मोठ्या पगाराची नोकरी तिने मागचा पुढचा विचार न करता सोडली. वेळ न दवडता तिने युपीएससीच्या अभ्यासाला तिने सुरुवात केली. सिव्हील सर्व्हिसेसची ही परीक्षा फक्त पुस्तकांचा अभ्यास करून किंवा तुम्ही फार हुशार आहात म्हणून पास होता येत नाही याची जाणीव असिमा लवकरच झाली. आज पर्यंत प्रत्येक परीक्षेत अव्वल असणारी असीमा युपएससीच्या पहिल्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरली होती. खरं तर कधीही अपयश न आलेल्या प्रत्येकास हा धक्का पचवणे कठीण गेले असते. तेच असिमाच्या बाबतीत घडले. या काळात ती प्रचंड दडपण व मानसिक तणावातून गेली.यातून बाहेर पडायला तिला बराच काळ गेला. पण ती मागे हटली नाही. ती रडत नाही तर लढत राहिली.....कधी स्वतःशीच तर कधी कुटुंबाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांच्या दडपणाशी.


प्रचंड तणावात असताना तिने आपले छंद जोपासले. त्यात मन रमविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याच दरम्यान तिला एका सरकारी संस्थेमार्फत राजस्थानमधील एका खेडेगावात भेट देण्याची संधी मिळाली. लोकांशी चर्चा करत... भेटत असताना तिची नजर घरातील एका 3 वर्षांच्या मुलीवर पडली. ती मुलगी जागेवरून हलुही शकत नव्हती. तिच्या आईशी बोलल्यावर असीमाला समजले की ती जन्मापासून अशीच आहे आणि पुरेसे पैसे नसल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाणे शक्य झाले नाही. समाजातील गरिबी आणि हतबलता याचा अतिशय खोल परिणाम असीच्या मनावर या घटनेमुळे झाला.असीमाची संवेदनशीलता किती प्रामाणिक आहे हे आपणास या घटनेवरून समजून येते. असीमा त्या मुलीच्या वेदनांचा विचार करून अस्वस्थ होत होती. आपण या अशा गरीब व वंचित लोकांसाठी काहीच करू शकत नसल्याची सल तिला सतावत होती. याबाबत ती अनेकदा आपल्या आईशी देखील बोलत होती. या लोकांसाठी काम करायचे असेल तर सिव्हील सर्व्हिसेस शिवाय पर्याय नाही याची जाणीव आईने असीमाला करून दिली होती.


शेवटी असीमाने दुसऱ्यांदा युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली व पूर्ण मन लावून जिद्दीने अभ्यास केला. आता फक्त गोल्ड मेडलिस्ट नव्हे तर एक संवेदनशील असीमा सामाजिक भावनेतून प्रयत्न करत होती. शेवटी तिच्या कष्टाचं चीज झालं. यात तिला 328 रँक मिळून आय आर एस (आय टी)मध्ये तिची निवड झाली होती. असीमाला समाजात जाऊन काम करण्याची इच्छा व स्वप्न असल्याने ती या यशाने फार खुश नव्हती. ती सदर पदावर रुजू तर झाली परंतु ती अस्वस्थच होती.


आपली मुलगी इतकी मोठी परीक्षा पास होऊनही खुश नसल्याची जाणीव व्हायला तिच्या वडिलांना फार वेळ लागला नाही. त्यांनी तिच्याशी यावर चर्चा करून पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देऊन तिच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.


आपल्या कुटुंबाचा आपल्यावर असलेला विश्वास व आपल्यातील जिद्द याच्या जोरावर तिला सन 2017 मध्ये इच्छित यश मिळाले. संपूर्ण भारतातून तिचा 12 व्या क्रमांक आल्याने तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. काल पर्यंतची गोल्डन गर्ल असीमा आता IAS असीमा मित्तल मॅडम झाल्या होत्या.


आता तिच्या यशावर लिहिलं जाऊ लागलं होतं. तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात होत्या. परंतु फार काळ ती या प्रसिद्धीच्या झगमगाटात अडकून पडली नाही. 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यावर मी फार काही लिहिणे उचित ठरणार नाही.


असीमा मित्तल मॅडम बोलताना नेहमी सांगतात, " फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही, त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. " आज त्यांच्या विचारांची व दृष्टिकोनाची प्रचिती आमच्या डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळांच्या बदललेल्या स्वरूपावरून दिसून येते. 


असीमा मित्तल हा फक्त एक शैक्षणिक प्रवास किंवा कष्टाच्या झाडाला लागलेलं गोड फळ नसून ती एक क्रांती आहे....ती एक विश्वास आहे...आदिवासी मुलांसाठी ती एक आत्मविश्वास आहे....नऊ दुर्गांचं जणू ती एक मानवी रूप आहे.


आज डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळा ज्या पातळीवर पोहचलेल्या आहेत, त्याची कदाचित कोणी कल्पना देखील केली नसेल. जो सकारात्मक बदल इथल्या निस्सीम निसर्गराजीत घडवून आणलाय, तो मित्तल मॅडम यांच्या प्रखर तपश्चर्येचं फळ आहे... त्यांच्या दिव्य दृष्टिकोनाचं फलित आहे. 


त्यांची बदली हा विषय काहींसाठी आनंदाचा असेलही...परंतु आश्रमशाळेतील मुलांचा विचार केला, तर त्यांच्यासाठी पोरकं करणारा आहे. 


मित्तल मॅडम यांच्या विचारांचा कस...त्यांनी घालून दिलेली स्वयंशिस्त...सतत नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची लावलेली सवय या गोष्टी जपणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असणार आहे.


त्यांच्या डहाणू येथील प्रवासाचा विचार केला, तर कामाच्या सर्वच परिसीमा ओलांडणारी असीमा असाच आहे...!


असो नुकत्याच झालेल्या झूम मीटिंगमध्ये हाताची स्वच्छता करण्याचा त्यांचा मंत्र मनाच्या स्वच्छतेपर्यंत पोहचेल यात शंकाच नाही. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला वेधचा पुढील प्रवास भविष्यवेधी ठरेल यात शंका नाहीच...


त्यांचा नाशिक येथील जिल्हा परिषदेतील प्रवास असाच आदर्शमय राहो व यातून राष्ट्र निर्माणाचे कार्य त्यांच्या हातून घडो हीच शुभेच्छा...!


- राजू ठोकळ, दाभोण, डहाणू

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें