सोमवार, 31 अक्टूबर 2022

फॉरेन टूर

 सर्वांनी हि पोस्ट जरूर वाचावी.

      *आयुष्यातील हार*

" मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फाँरेन टूर आहे" बँकाँकच्या हाँटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करुन दिली.


"साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करुन दिलीये." आमचा ग्रुप लिडर सर्वांना सांगू लागला. "तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खुप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते"


सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुष झालो पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाहीं. हळूहळू सगळे आपला परीचय करुन देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मुडमध्ये नव्हतं.


"मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फाँरेन टूर आहे" त्या हाँलमध्ये एकदम शांतता पसरली.मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.


"आतापर्यंत आम्ही भुतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय"


अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामुली कारकुंड्याने इतक्या फाँरेन टुर्स कराव्या हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.


"पाठक तुम्ही एकटे गेले होतात की सहकुटूंब?" मी विचारलं


" सहपत्नीक! तसं मुलांनाही तीनचार देशात घेऊन गेलो होतो पण त्यांच्या शिक्षण आणि करीयरमुळे सगळ्या देशात नेता आलं नाही"


" पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही" मी म्हंटलो तसा एकच हशा पिकला. पण पाठक गंभीर होता.


" अहो साहेब जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असतांना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?"


सगळे शांत झाले.


"आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड" पाठक पुढे बोलू लागला "जगप्रवास हे आमचं ध्येय होतं. पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता तो आम्ही अवलंबला....."


तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले. पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो. मी त्याला म्हंणालो.


पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं"

"जेवण झाल्यावर या ना साहेब रुममध्ये. या, छान गप्पा मारु"


ते सगळे जेवायला गेले मी मात्र रुमकडे पळालो. दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. जेवण झाल्यानंतर मी सौ. ला घेऊन पाठकच्या रुममध्ये गेलो.


"पाठक मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलंत. इतक्या फाँरेन टुर्स, त्याही कमी पगारात!" मी विचारलं.


"सर विशेष काही नाही? आम्ही आमची लाईफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही टिव्ही, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. टू व्हिलर आता मुलानं घेतली तीही अगदीच गरज होती म्हणून. मी, माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हाँटेलिंग केलं नाही. हाँटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते"


"याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एंजाँयमेंट काहीच केली नाही. अहो त्या वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना?"


पाठक हसला.


"साहेब एंजाँयमेंटचा अर्थ चमचमीत नाँनव्हेज खाणं, दारु पिणं, चारीत्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरीयल्स पहाणं हा असेल तर तो आम्हांला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पाँझिटिव्ह एंजाँयमेंट आहे असं तुम्हाला नाही वाटत? आता राहीला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा, तर तुम्हाला सांगतो साहेब आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहीली आहे."


बापरे हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हंटलं "बरं ते जाऊ द्या. मुळ विषयाकडे येऊ या"


"हं तर बचतीबरोबरच अँडिशनल इन्कमसाठी मी दुकांनांचे, छोट्या फर्म्सचे अकाऊंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर मुलाने गँरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं"


"पण मग मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का?"


" मुलं जात्याच हुषार आणि सिन्सियर होती.स्काँलरशिप मिळवून त्यांनी शिक्षणं पुर्ण केली. मला फक्त परिक्षेचा फाँर्म भरण्यासाठी ती पैसे मागत."


"आता काय करतात मुलं?"


"मुलगी साँफ्टवेअर इंजीनियर आहे. तिने एम.एस. केलंय अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते. तिचा नवराही इंजीनियर आहे. दोघांनी कंपनी सुरु केलीय. मस्त चाललंय तिचं. मुलगा नुकताच एम.डी. झालाय मेडिसीनमध्ये. सध्या एका हाँस्पिटलला प्रँक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हाँस्पिटल उभारायचा विचार करतोय"


मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलीला प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं, पण तिथेही ती व्यवस्थित रहात नव्हती. भांडणं करुन माहेरी निघून येणं सुरुच होतं. मुलाने तर नाकात दम आणला होता. काँलेजमध्ये असतांना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं. दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. काँलेजमधून काढून मी त्याला बियरबार काढून दिला. आम्हांला न जुमानता एका टुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारु पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकाँकच्या टूरला आलो होतो.


"आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे" पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझीतंद्री भंगली.


"सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हांला कंजूष म्हणतात पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा औषधाची एक गोळी नाही लागली आम्हांला. तोही खर्च आमचा वाचला."


मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली होती. तुलनेत पाठक पतीपत्नी चाळीशीतले वाटत होते. पाठकची बायको तर अजुनही चवळीची शेंग वाटत होती.


"साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!" पाठक बोलला.


"आमचं ठिकच आहे. औरंगाबादला या. तिथे आमचा मोठा बंगला आहे दोन कोटीचा. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आमचे फ्लँटस् आहेत. गावी पाचशे एकर जमीन आहे. मुलगा बियरबार चालवतो. मुलगी पुण्यात दिलीय" मी थोडं मग्रुरीनेच सागितलं.


‌"अरे वा छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच रहातो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण काहो साहेब एवढी सगळी प्राँपर्टी फक्त पगारावर जमवली? की काही साईड बिझीनेसही आहे तुमचा?"


‌मी जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करुन कमवलं होतं. दोन तीनदा मी पकडलाही गेलो होतो पण मंत्र्यांच्या क्रुपेने सहीसलामत सुटलो होतो.


‌"अहो पाठक समजून घ्या. एका सरकारी खात्यातला मी वरीष्ठ अधिकारी! सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहीत आहे. मला म्हणूनच तर मला आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असूनही तुम्ही हे सर्व जमवलं कसं?"


‌"साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं. मी आनंद मिळवण्यात. अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की!"

‌पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्याने माझी शान कुठे पाहिली होती?


‌"घरी या एकदा पाठक. पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हांला"


‌पाठक निर्मळ हसला. मग म्हणाला.

‌"पैसेवाल्यांचे थाटच वेगळे असतात साहेब. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हांलाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल"


‌"हरकत नाही. येऊ आम्ही. बरं आता रजा घेतो. गुड नाईट"


‌आम्ही रुमवर परतलो पण मला झोप काही लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. 


खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतो. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, बी.पी. डायबेटीस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पाँडिलायटीस, निद्रानाश... कोणते आजार नव्हते मला? अजून साठी गाठली नव्हती तरी सत्तरीचा म्हातारा दिसत होतो. थकव्यामुळे मी बँकाँकचं साईटसिईंगही एंजॉय करु शकलो ‌नव्हतो.

‌ बँकाँकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करुन रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्याने त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं.

पाठकला इंप्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पहात होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली.एक छोटंसं एकमजली घर होतं ते. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता.


‌"या साहेब, या मँडम" पाठकने आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरलेली. मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती. आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोने समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हाँलमध्ये थोडंसं पण सुबक फर्निचर होतं.भिंतीवर दोनच पण सुरेख पेंटिंग्ज होती. टिपाँयवर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लाँवरपाँटस् होते. शोकेस ट्राँफिजने भरलेलं होतं.


‌"बापरे इतक्या ट्राँफिज!कुणाच्या आहेत या?" माझ्या तोडातून नकळत शब्द निघून गेले.


‌"सगळ्यांच्याच! मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौ च्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बँडमिंटन स्पर्धेतल्या"


‌"वा छान" मी चांगलाच इंप्रेस झालो.


‌"या साहेब तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत झोपडीच म्हणायला हवी"


‌मी सहमत असल्याचं स्मित केलं. पण आम्ही जसजशी एकेक रुम पहायला लागलो तसतसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकुण एक खोली पाठक कुटूंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी व्रुत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती. छोटंसं असूनही ते घर अप्रतिम होतं.


‌बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळभ माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा बंगला महागड्या, आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पुर्णपणे अभाव होता. मला जाणवलं, पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचाराने, चारित्र्याने, कर्तृत्वाने नक्कीच श्रीमंत होता.


‌"घ्या साहेब" पाठकच्या बायकोने माझ्यासमोर शिरा-पोह्याची डिश ठेवली. त्यांच्या वासानेच माझी भुक खवळली. मी चमच्याने त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली.


‌"वा अप्रतिम!" मी पाठककडे पहात म्हणालो.


‌"साहेब तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात नाहीतर आम्ही एक वेगळाच मेनू आम्ही ठरवला होता"


‌"अशी सुरेख चव असेल तर जेवायला यावंच लागेल" मी पहिल्यांदाच कुणाची इतकी स्तुती करत होतो.


‌आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आला. ओळख करुन दिल्यावर तो माझ्या आणि सौ. च्या पाया पडला.


‌"हाँस्पिटलचं काम कुठपर्यंत आलंय. तुझे वडिल मदत करणार असतील ना तुला!"

‌मी मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला.


‌"बाबांची मदत घ्यायचीच कशाला काका? अहो आमच्यासाठी त्यांनी काय नाही केलं? आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईने आपल्या कष्टाने शुन्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पहातोय. अजून कीती अपेक्षा करायची आम्ही त्याच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला! त्यांची मदत घेतली तर आम्हांला कायमची रुखरुख लागेल आम्हांला की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो."


‌त्याच्या सडतोड पण उत्तराने मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांविषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी मुलांना का देऊ नाही शकलो याचं मला दुःख झालं. दोन पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय, ऐतखाऊ बनवण्यासाठी? मला स्वतःचीच घ्रुणा वाटू लागली.


‌पाठक कुटूंबाचा निरोप घेऊन निघालो. पण मी दुःखाने जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटूंबाने मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटूंबाची, संपत्तीची लाज वाटू लागली होती.


दिवस बदलत गेले. निवडणूका झाल्या. माझ्या ओळखीचे आमदार, खासदार पराभुत झाले. सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती. कारण मी आता नोकरीत नव्हतो.


‌एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर ४-५ सुटाबुटातील माणसं उभी होती.


‌"आम्ही इन्कमटँक्स डिपार्टमेंट कडून आलोय. "त्यातल्या एकाने कार्ड माझ्या हातात देत दिलं. मी गारठलो, माझे हातपाय थरथर कापू लागले.


‌"मी माझ्या वकिलाशी बोलू शकतो?" मी कापऱ्या आवाजात विचारलं.


‌" जरुर बोला! त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्र आहेत आमच्याकडे"


‌"अहो पण साहेब मी आता रिटायर झालोय."


‌"साहेब जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल" तो स्मित करत म्हणाला. 


मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो. ‌दुपारी तीन वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरु होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेने त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. 'आता भोगा आपल्या पापाची फळं' अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या.


‌"चला साहेब" झडतीत सापडलेले बेहिशोबी ₹२५ लाख आणि दोन किलो सोन्याच्या चिप्स् दाखवत एक अधिकारी म्हणाला.


‌"कुठे?"


‌"चौकशीसाठी आम्ही तुम्हांला ताब्यात घेत आहोत"


‌मी मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. ‌मला अचानक पाठकची आठवण आली.


‌"साहेब एक फोन लावू?" मी विचारलं.


‌"नो पाँलिटिकल इन्फ्लुएन्स"


‌"साहेब हा माणूस साधा कारकून आहे."


‌"ठिक आहे. स्पिकर आँन करा"


‌मी पाठकला फोन लावला.


‌"हँलो पाठक मी महाजन बोलतोय! पाठक तुम्ही जिंकलात. मी हरलो."


‌"काय झालं साहेब? असं का बोलताय?"


‌"पाठक इन्कमटँक्सची धाड पडली आज बंगल्यावर! मी पकडला गेलो."


‌क्षणभर शांतता पसरली. मग पाठकचा आवाज आला.


‌"साहेब तुम्हाला सोडवण्याइतका मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरुर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं ते गेलं तर जाऊ द्या. तुम्हांला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या एका महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातील अनेक कुटुंबं सहा महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरीबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खुप आनंद असतो साहेब, काही काळजी करु नका. सगळं व्यवस्थित होईल."


‌का कुणास ठाऊक पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटू लागलं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली. सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल. नाहीतरी ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कोणती माझी किंमत होती?साधी सहानुभूती सुध्दा त्यांनी मला दाखवली नव्हती.

‌पाठकच्या रुपात एक खरा *हितचिंतक मला भेटला होता. पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटून गेली.*


🙏🙏🙏🙏🙏

शनिवार, 1 अक्टूबर 2022

IAS असीमा मित्तल मॅडम

 कामाच्या परिसीमा ओलांडणारी असिमा....


रात्री उशीराने मोबाईलची लाईट चमकली म्हणून मोबाईल हातात घेतला व व्हॉट्स अपवर आलेला मेसेज वाचू लागलो. अनेक मेसेज होते, परंतु त्यातील एकात असिमा मित्तल मॅडम यांची बदली झाल्याचा मेसेज वाचून मन अगदी रितं झालं. काल त्यांचा पिवळ्या रंगाच्या साडीतला फोटो डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यांचं ते वागणं... शिक्षकांकडून काम करून घेण्याची पद्धत....इथल्या पाड्यांवर काम करण्याची तळमळ...आदिवासी बांधवांच्या शेतीविषयक समस्या समजून घेण्याची उदारता...वेळेच्या बाबतीत असणारा काटेकोरपणा आणि तितकीच विनम्रता असे अनेक गुण मनाला छेडू लागले आणि मग एकंदरीत त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीचा आलेख डोळ्यासमोर उभा राहिला.


राजस्थानमधील जयपूर या पिंक सिटीत त्यांचा जन्म 30 जून 1992 रोजी झाला. जयपूरच्या मातीतले संस्कार काल त्यांच्या पिवळ्या रंगाच्या साडीवरून दिसून आले असतीलच. नवरात्रीच्या नऊ रंगांची जादू एकंदरीत त्यांच्याही मनावर असल्याचे त्यातून दिसून आले. 


शालेय जीवनापासूनच असिमा अभ्यासात हुशार होती. परंतु ती फक्त पुस्तकी किडा देखील नव्हती. विविध स्पर्धा असोत वा शालेय खेळ यात भाग घेऊन ती त्यात नेहमी अव्वल येत असे. तिने शालेय जीवनातच अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत भाग घेऊन यश मिळवले होते. त्यामुळे आपण कोणतीही परीक्षा दिली तरी त्यात हमखास यश मिळेल असा आत्मविश्वास तिच्या मनात तयार झाला होता.


आपले कष्ट व चिकाटी यांवरील आत्मविश्वासामुळे तिने जेईईचा फॉर्म भरताना फक्त आय आय टी, मुंबई हा एकमेव पर्याय दिला. तिच्या जागेवर दुसरा कोणी असता, तर त्याने नक्कीच 10-20 पर्याय अजून निवडले असते हे मात्र नक्की. परंतु इतिहास घडवणारी माणसं मुळात हटके असतात आणि ते कोणत्याही चौकटीत बसत नाहीत हेच असिमाच्या बाबतीत आपणास दिसून येते.


आय आय टी मुंबईत पदवीचं शिक्षण घेऊन तिने सिव्हील इंजिनिअर ही पदवी तर प्राप्त केलीच सोबत गोल्ड मेडल देखील मिळवले होते.


पदवीचं शिक्षण चांगल्या श्रेणीत पूर्ण केल्याने तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळायला फार उशीर लागला नाही. उत्तम सोयी सुविधा असणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी ती आता करू लागली होती. परंतु मन मात्र त्या ऐशोआरामात रमत नव्हतं. असिमा या अशा टिपिकल कामासाठी बनलेली नाही हे तिचं मन तिला सारखं सांगत होतं.


आपलं मन काय सांगतंय हे तिनं ऐकलं व इतक्या मोठ्या पगाराची नोकरी तिने मागचा पुढचा विचार न करता सोडली. वेळ न दवडता तिने युपीएससीच्या अभ्यासाला तिने सुरुवात केली. सिव्हील सर्व्हिसेसची ही परीक्षा फक्त पुस्तकांचा अभ्यास करून किंवा तुम्ही फार हुशार आहात म्हणून पास होता येत नाही याची जाणीव असिमा लवकरच झाली. आज पर्यंत प्रत्येक परीक्षेत अव्वल असणारी असीमा युपएससीच्या पहिल्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरली होती. खरं तर कधीही अपयश न आलेल्या प्रत्येकास हा धक्का पचवणे कठीण गेले असते. तेच असिमाच्या बाबतीत घडले. या काळात ती प्रचंड दडपण व मानसिक तणावातून गेली.यातून बाहेर पडायला तिला बराच काळ गेला. पण ती मागे हटली नाही. ती रडत नाही तर लढत राहिली.....कधी स्वतःशीच तर कधी कुटुंबाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांच्या दडपणाशी.


प्रचंड तणावात असताना तिने आपले छंद जोपासले. त्यात मन रमविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. याच दरम्यान तिला एका सरकारी संस्थेमार्फत राजस्थानमधील एका खेडेगावात भेट देण्याची संधी मिळाली. लोकांशी चर्चा करत... भेटत असताना तिची नजर घरातील एका 3 वर्षांच्या मुलीवर पडली. ती मुलगी जागेवरून हलुही शकत नव्हती. तिच्या आईशी बोलल्यावर असीमाला समजले की ती जन्मापासून अशीच आहे आणि पुरेसे पैसे नसल्याने तिला दवाखान्यात घेऊन जाणे शक्य झाले नाही. समाजातील गरिबी आणि हतबलता याचा अतिशय खोल परिणाम असीच्या मनावर या घटनेमुळे झाला.असीमाची संवेदनशीलता किती प्रामाणिक आहे हे आपणास या घटनेवरून समजून येते. असीमा त्या मुलीच्या वेदनांचा विचार करून अस्वस्थ होत होती. आपण या अशा गरीब व वंचित लोकांसाठी काहीच करू शकत नसल्याची सल तिला सतावत होती. याबाबत ती अनेकदा आपल्या आईशी देखील बोलत होती. या लोकांसाठी काम करायचे असेल तर सिव्हील सर्व्हिसेस शिवाय पर्याय नाही याची जाणीव आईने असीमाला करून दिली होती.


शेवटी असीमाने दुसऱ्यांदा युपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली व पूर्ण मन लावून जिद्दीने अभ्यास केला. आता फक्त गोल्ड मेडलिस्ट नव्हे तर एक संवेदनशील असीमा सामाजिक भावनेतून प्रयत्न करत होती. शेवटी तिच्या कष्टाचं चीज झालं. यात तिला 328 रँक मिळून आय आर एस (आय टी)मध्ये तिची निवड झाली होती. असीमाला समाजात जाऊन काम करण्याची इच्छा व स्वप्न असल्याने ती या यशाने फार खुश नव्हती. ती सदर पदावर रुजू तर झाली परंतु ती अस्वस्थच होती.


आपली मुलगी इतकी मोठी परीक्षा पास होऊनही खुश नसल्याची जाणीव व्हायला तिच्या वडिलांना फार वेळ लागला नाही. त्यांनी तिच्याशी यावर चर्चा करून पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देऊन तिच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.


आपल्या कुटुंबाचा आपल्यावर असलेला विश्वास व आपल्यातील जिद्द याच्या जोरावर तिला सन 2017 मध्ये इच्छित यश मिळाले. संपूर्ण भारतातून तिचा 12 व्या क्रमांक आल्याने तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. काल पर्यंतची गोल्डन गर्ल असीमा आता IAS असीमा मित्तल मॅडम झाल्या होत्या.


आता तिच्या यशावर लिहिलं जाऊ लागलं होतं. तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती घेतल्या जात होत्या. परंतु फार काळ ती या प्रसिद्धीच्या झगमगाटात अडकून पडली नाही. 


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यावर मी फार काही लिहिणे उचित ठरणार नाही.


असीमा मित्तल मॅडम बोलताना नेहमी सांगतात, " फक्त अभ्यास करणे पुरेसे नाही, त्याची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. " आज त्यांच्या विचारांची व दृष्टिकोनाची प्रचिती आमच्या डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळांच्या बदललेल्या स्वरूपावरून दिसून येते. 


असीमा मित्तल हा फक्त एक शैक्षणिक प्रवास किंवा कष्टाच्या झाडाला लागलेलं गोड फळ नसून ती एक क्रांती आहे....ती एक विश्वास आहे...आदिवासी मुलांसाठी ती एक आत्मविश्वास आहे....नऊ दुर्गांचं जणू ती एक मानवी रूप आहे.


आज डहाणू प्रकल्पातील आश्रमशाळा ज्या पातळीवर पोहचलेल्या आहेत, त्याची कदाचित कोणी कल्पना देखील केली नसेल. जो सकारात्मक बदल इथल्या निस्सीम निसर्गराजीत घडवून आणलाय, तो मित्तल मॅडम यांच्या प्रखर तपश्चर्येचं फळ आहे... त्यांच्या दिव्य दृष्टिकोनाचं फलित आहे. 


त्यांची बदली हा विषय काहींसाठी आनंदाचा असेलही...परंतु आश्रमशाळेतील मुलांचा विचार केला, तर त्यांच्यासाठी पोरकं करणारा आहे. 


मित्तल मॅडम यांच्या विचारांचा कस...त्यांनी घालून दिलेली स्वयंशिस्त...सतत नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची लावलेली सवय या गोष्टी जपणं ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असणार आहे.


त्यांच्या डहाणू येथील प्रवासाचा विचार केला, तर कामाच्या सर्वच परिसीमा ओलांडणारी असीमा असाच आहे...!


असो नुकत्याच झालेल्या झूम मीटिंगमध्ये हाताची स्वच्छता करण्याचा त्यांचा मंत्र मनाच्या स्वच्छतेपर्यंत पोहचेल यात शंकाच नाही. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला वेधचा पुढील प्रवास भविष्यवेधी ठरेल यात शंका नाहीच...


त्यांचा नाशिक येथील जिल्हा परिषदेतील प्रवास असाच आदर्शमय राहो व यातून राष्ट्र निर्माणाचे कार्य त्यांच्या हातून घडो हीच शुभेच्छा...!


- राजू ठोकळ, दाभोण, डहाणू